मंगळवार, २९ जानेवारी, २०१३

राजगड - शोध सह्याद्रीतून ....२६/२७- २०१३


राजगड - शोध सह्याद्रीतून ....



















किती शांत वातावरण होतं. तरीही अधून-मधून वाऱ्याची गार झुळूक अंगावर येत. जणू ती वारेगुलाबी थंडी एकटक खेळत,गुणगुणत स्व:तहाशीच ...

तिने आपले बाहू सर्वत्र पसरले होते ,संपूर्ण राजगड परिसर तिने आपल्या अखत्यारीत आणले होते , तिच्या मगरमिठीतून कुणाचीच सुटका होत न्हवती , गारठलेली ती पाने फुले हि , 'सूर्य नारायणाच्या दर्शनास जणू  आतुरली होती , त्याकडून मिळनाऱ्या कोमलतेच्या उबेसाठी ...

 पण अजून तसा बराच अवधी होता.
राजगडचं रूपं काळोखात हि कस लक्ख उठून दिसत होतं , शेवटी स्वराज्याची ती राजधानी,  आपल्या शिवबाजी , इथल्या रयतेची राजधानी, जिथे आपल्या राजाचं २५ वर्ष वास्तव्य होतं.
जिथे अनेक सुख दुखाचे प्रसंग स्व:तहा ह्या किल्ल्याने पहिले , इथल्या मातीने अनुभवले , इथली प्रत्येक वास्तू त्याची साक्ष देत आजही , अजूनही खंबीरपणे उभी आहे , ते पाहूनच उर भरून येतो , कुतूहल जागं होतं , अभिमान वाटू लागतो , खरच भाग्यवान आहोत आपण इथल्या मातीत आपला जन्म झाला.
हे सर्व अनुभवत होतो मी राजगडवर ,तिथल्या मातीत..

तन-मन हरवलं होतं राजगडचं रूप न्ह्याहाळत , स्व:ताहाशीच कुजबुज करत होतं ते , तेवढ्यात माझ्या वहिनीचा मंजुळ स्वर कानी पडला , डोक्यापर्यंत घेतलेली चादर अलगद उचलून बाजूला सारून पाहिली नि तोच घड्यालाकडे लक्ष गेलं , सकाळचे साडे सात होत आले होते.
पुन्हा एकवार घड्याळाकडे पाहू लागलो , डोळे चूळबळू लागलो . तेंव्हा आपण कुठे आहोत ह्याची जाणीव झाली.
अजूनही राजगडाची ती सोनेरी क्षणे मनातून नि नजरेतून हलत न्हवती. रात्री उशिरा घरी परतलो होतो नि जेवून-खाऊन तसाच झोपी गेलो होतो, राजगड वर घालवलेले ते सर्व क्षण आठवतं ...

मागच्याच वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राजगडला जाऊन आलो होतो.
त्या आठवणी ताज्या असतानाच पुन्हा राजगडला जाण्याचा योग आला... तो रश्मीमुळे, ..
तिच्या ''शोध सह्याद्री '' ह्या तिने स्थापिलेल्या अन ''छत्रपती शिवाजी महाराज '' ह्यांच्या जयंती वेळी सुरु केलेल्या छोट्याश्या पण महत्वाची कामगिरी त्यातून बजावणार्या ग्रुप मुळे .

खास , येणारया पिढीसाठी - शाळेतल्या मुलांमध्ये आपला हा गौरवशाली 'गड - कोट - किल्ले' ह्यांचा इतिहास , त्यांच्या मना मनात रुजवावं , किल्ल्याचं महत्व पटावं , त्यातून मिळणार्या प्रेरणेतून , त्यांच स्वतःच उज्ज्वल भविष्य घडावं हा ह्या '' शोध सह्याद्रीचा'' मुख्य उद्देश ...
आणि म्हणूनच माझं जाणही तितकंच निश्चित होतं .


























त्या निरागस लहान मुलांमध्ये मिसळणं , त्यांच्याशी संवाद साधणं  , त्यांच्या निरागस प्रश्नांना उत्तर देणं ' त्यांना आपला हा गौरवशाली गड-कोट-किल्ल्यांचा इतिहास समजावून सांगणं, ' हे मला अनुभावायचं होतं.
आणि ते सगळ पूर्ण झालं ,  ''शोध सह्याद्रीचे '' २ दिवसाच्या आखलेल्या ह्या राजगड मोहिमेत ...
त्याबद्दल मनापासून धन्यवाद आपल्या सर्व टीम ला ...

राजगड ट्रेक दरम्यान माझ्या मनावर आपला छाप उमटवून गेलेले काही क्षणांचे मी इथे वर्णन करणार आहे :-
१) वर दिल्या प्रमाणे लहान मुलांमध्ये मिसळणं खरच खूप वेगळा आनंद असतो, त्याचं ते निरागस मन आपल्याला आपल्या बालपणीच्या आठवणीत नकळत घेऊन जातं.
त्यांच्याशी संवाद साधताना ,त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांना कळेल अशा भाषेत समजावून सांगणं खरच खूप कठीण असतं ,प्रत्येकाला ते जमतच अस नाही...

ट्रेक दरम्यान अशी अनेक निरागस प्रश्न कानावर पडली. त्याच उत्तर त्यांना समजेल अशा शब्दात सांगण्याचा मी माझ्यावतीने तसा पूर्ण प्रत्यत्न केला .
आपण ज्यावेळेस आपल्याकडील ज्ञान इतरांना देतो, आणि देत असता त्यांच्या चेहऱ्यावरचे ते समाधानी भाव , ज्यावेळेस निरखतो  , त्यावेळेस मनात  स्फूर्ती निर्माण होते , मनं अधिक उत्साहाने टवटवीत होवून बहरले जाते.
माझं मनही असंच बहरलं .....त्या वातारवणात ........

विशेष म्हणजे परतीच्या वेळी ट्रेकबद्दल घेण्यात आलेल्या,  आप आपल्या प्रतिक्रिया देत असता केल्या गेलेल्या त्या कौतुकाने :-) विषेच आभार ....संपदाचे , माझ्या बहिणीचे :))

२) निसर्ग हा एकमेव असा मित्र आहे कि त्याच्या सानिध्यात असता तो इतर विचार 'जे मनात नेहमीच धूडगूस घालत असतात ' , त्यांना तो त्यावेळेस तरी आपल्या आजुबाजूस फिरकू देत नाही.
एका आगळ्या-वेगळ्या धुंदीत आपल्याला तो घेऊन जातो. एका वेगळ्या लयात आपल्याला तरंगत ठेवतो. एक वेगळी सफर घडवून देतो.  त्यात असतो असतो फक्त आनंद ...आनंद नि आनंद ..
नि जीवनशिक्षण जे पाठ्य पुस्तकातून कधीही मिळत नाही.
ते त्याच्या सानिद्ध्यात आल्यावर ,त्याच्याशी एकांतात सवांद साधता मिळून जातं.

दुपारची वेळ , माचिवरल्या पद्मावती मंदिर मागे असंच काही क्षण आजूबाजूचा निसर्ग , त्यातील निर्जीव सजीव घटकं,  नजरेत उतरवतं,  एकटक त्या तटबंदी जवळ बसून होतो.
बाजूला काही अंतरावर माकडांची टोळी त्यांच्या मस्तीत गुंग होती.  त्यातील एक कुटुंब माझ्या अगदी समीप येउन बसलं. घाबरलं नाही. मी हि आपला जागचा उठलो नाही. बस्स त्यांना निरखून पाहू लागलो.
प्रेमाने ...
ते चौकट कुटुंब , त्यातलं ते चिमुकलं पिल्लू , आईच्या अंगा खांद्याशी लगट करत होतं.
कधी आपली भूख भागवतं होतं...
किती गोजिरवानं नि छानसं पिल्लू होतं ते..

काही वेळेत टुनटुन उडया मारत ते आईपासून दुरावलं नि तटबंदी वरून बागडत बागडत , आपल्या इतर बांधवांकडे जावू लागलं. आई अन तिची सावली सोबत असली म्हणजे , कसली काळजी नि काय ...
क्षणभर वाटलं ,ते सगळे क्षण आपल्या कॅमेरात बंदिस्त करावेत. पण म्हटलं , नको ..ते आपण आपल्या नजरेतच सामावून घ्यावं ...कायमचं...!

दुसऱ्याच  क्षणी निळ्याशार आकाशात त्या काळ्या निळ्या इवल्याश्या पाखराची ती उंच झेप मनाला भरारी देत होती.पाली दरवाज्याचा भक्कमपणा , बालेकिल्ल्याच ते रांगड रूप , त्याच ते सौंदर्य अन निळेशार आकाश मनाला उजळवून टाकत होतं.
दुपारच जेवण उरकून सुवेळा माचीकडे जातेवेळी , डुबा खुणावू लागला.
नजरेत येऊ लागला. तसं  गो. नि दांडेकरांची '' वाघरु'' नि त्यातील ते क्षण '' तिथल्या उंच झाडी वर वाघरुसाठी बांधलेले मचाण'' तो सारा प्रसंग डोळ्यासमोर नाचू लागला.

पुढे नेढे जवळ , त्या नेढेतून त्या वाघरू च क्षणात नाहीस होणं, हे सगळे त्या कादंबरी मधले प्रसंग एक एक करत आठवू लागले. मन भारावू लागले. आणि त्या भारावलेल्या स्थितीतचं आम्ही , मी पुन्हा पद्म्वती मंदिरकडे परतू लागलो.

सूर्य हळू हळू मावळती कडे झुकू लागला. तशी रात्रीच्या जेवणाची लगबग सुरु झाली.
संपदा , सिद्धेश , सुशील , सुशांत , रश्मी , यतीन , भरत , प्रणीत सर्व एकमेकांना  मदत करत होते.
जेवण तयार करण्यास मी हि अधे मध्ये इतर कामांना हातभार लावत होतो.

अशातच सूर्य देवता मावळतीकडे केंव्हाच लुप्त झाले होते.  पण त्यांची ती सोनेरी तांबूस रूप मी माझ्या कॅमेरात नि नजरेत बंदिस्त केली होती.
































रात्रीच गडद छाया हळू हळू गडावर आपलं विस्तार करू पाहत होती. तरीही पौर्णिमा असल्याकारणाने , चंद्र देवतेच्या शीतल प्रकाशित छायेत गड न्हाहून निघालं होतं.

काही वेळ त्या ढगांशी लपाछुपिचा खेळ खेळणार्या त्या चांदोबा कडे टकमक पाहत असता, एक विचार मनात तरळून गेला.
मनं म्हणू लागलं , 'आता पर्यंत कित्येक क्षण ह्याने आपल्या स्मरणात ठेवले असतील ...
कित्येक महत्वाचे प्रसंग , इथला इतिहास आपल्यात सामावून घेतला असेल न्हाई !
मन असंच काहीसं  कुजबुज करत होतं.
काही गोष्टींशी जुळवणी करत होतं अन त्याचबरोबर वेळ हि पुढे पुढे सरत होती.

जेवण आता  तयार झालेलं , चुलीवरल्या जेवणाची अन ते तयार करताना केल्या गेलेल्या मेहनतीची चव,
अन तो खमंगच इतका स्वादिष्ट होता कि त्यानेच मनं आणि उदर दोन्हीही तृप्त झाले.


काही वेळेतेच जेवण उरकून सगळे (बच्चे कंपनी विशेष करून ) थकले भागलेले असल्याने ते हि झोपी गेले ,
मी हि आपली चादर पायापासून डोक्यापर्यंत घेत झोपी गेलो.
पण रात्रीची ती गुलाबी थंडी अंगावर चादर घेतली असता हि अलगद स्पर्शून जात होती.
मनाची हुरहुरी वाढत होती.सर्वत्र शांतता नांदू लागली.
पद्मावती मंदिर बाहेर कुणा एका दोघांचा आवाज हळुवार कानी पडत होता.
अशातच एका क्षणी , एका कसल्यातरी मोठ्या आवाजाने सगळं वातावरण ढवळून निघालं .
सगळं एकाकी  शांत झाल्यासारखं  भासलं. कुणास ठाऊक काहीतरी विपरीत घडलं असावं असा एक विचार मनाशी स्पर्शून गेला. पण नंतर म्हटलं बाहेरील मुले काहीतरी दंगा मस्ती करत असावी.
असो...

घड्याळाचे काटे वर्तुळाकार फिरत फिरत एकमेकान जवळ येतं  अन पुन्हा दुरावतं असा एकंदरीत  त्यांचाखेळक्रम चालू होता.  त्यांच्या त्या खेळ - खेळा मध्येच पहाटेचे ६ वाजले होते.
अजून हि तसं उजाडलं न्हवत. पण थंडीने मात्र झोडपलं होतं.

त्या गारठ्यात पद्मावती तलावाजवळ गेलो नि त्यातल्या थंडगार पाण्याने (अर्थात बॉटल ने पाणी भरून मग ) हाता तोंडावर पाणी शिंपडले. काही वेळेतच रात्रीचा उरलेला भाताचे फोडणी भात करून नि चहा पाणी घेऊन आम्ही सगळे संजीवनी माचीकडे निघालो.

संजीवनी माचीकडून मग पाली दरवाज्याकडे , अन तिथून पुन्हा पद्मावती मंदिराकडे ,
प्रत्येक ठिकाणी रश्मी , संपदा , यतीन , प्रीतम , आपल्याजवळील असलेली माहिती, लहान मुलांपर्यंत पोहोचवत, त्यांना ते समजावून सांगत ....माझाही त्यात थोडाफार हातभार असे ,
मन तेंव्हा साहजिकच अधिक फुलत, कारण आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्यांना देण्यात जो आनंद असतो , त्याच काय नि कसं वर्णन करावं  ....असो

दुपारचे २ वाजले होते. परतीचा मार्ग जवळ येत होता , वेळ हि अशी गोष्ट आहे कि कधी कुणासाठी थांबत नाही. 
झाली परतीची वेळ झाली , निघण्याची घाई झाली , राजगड , राजगड , राजगड ...
 हे २ दिवस कसे त्वरित निघून गेले , कसे भुर्रकन उडाले ते कळलेच नाही , राजगडचं ते राजवैभव , तिथल्या प्रत्येक वास्तूतलं सौंदर्य नजरेत बंदिस्त करून आम्ही निघालो पुन्हा परतीच्या वाटेला ...

पण खरंच राहवत न्हवतं ..' कुणीतरी माझ्या पायाला साखलदंड बांधा रे '  
म्हणजे मी इथला जागचा हलणार नाही. 
मनात एकप्रकारे अशी आरडाओरड सुरु होती. 
पण त्यावर इलाज न्हवता. चोर दरवाज्याने आलो तसंच पुन्हा त्याच वाटेने गुंजवणे कडे निघालो. 
काही तासातच गुंजवणे गावात पोहोचलो हि ...

गावात पोहोचताच  तिथल्या हापशी वर हातपाय धुतले  नि पुढे शिवरायांच्या प्रतिमेचे मनोमन दर्शन घेतले आणि शाळेजवळील पटांगणात उभा राहिलो .
तेवढ्यात समोरून एक आजीबाई काठी टेकवत टेकवत हळुवार थरथरत्या अंगांनी माझ्या बाजूला येउन बसली.चेहर्यावर असंख्य त्रयस्त छटा , सुरकुत्या लांबूनच दिसत होत्या.

तुम्ही ह्याच गावाचे का ? ह्या प्रश्नाने मी बोलण्यास सुरवात केली.

हो रे बाबा, इथलेच..
काय सांगू , दोन तीन दिवसापासून  ताप थंडी , उलट्या चालू आहेत.
डॉक्टर कडे गेले होते.  २०० रुपये घेतले.
आपला हातावरची पट्टी दाखवत थकल्या आवजात त्या आजीबाई बोलत होत्या.

मरण पण येत नाही रे बाबा , सुनेकडे लाह्या मागितल्या दिल्या नाही.
मुलाकडे पैसे मागितले दव्यासाठी ते दिले नाही.  मरण पण येत नाही रे.. नाही येत...
स्वतःशीच बोलल्यागत हळुवार थरथरत्या ओठाशी त्या पुटपुटत होत्या.

बाबा दहा रुपये मिळतील का ?
त्यांनी माझ्याकडे वळून पाहिलं , मिळतील ह्या अपेक्षेने ,
पाकिटात किती पैसे शिल्लक होते हे मलाच ठाऊक न्हवतं.
मी  माझं पाकीट बाहेर काढलं नि जी नोट हाती आली ती देऊ केली.
ते देताना त्यांच्या चेहऱ्यावरील ते भाव बघण्यासारखे होते.
त्यांनी मला मनोमन आशीर्वाद दिला.  त्यांचे चरणस्पर्श करून त्यांचा निरोप घेऊन मी आमच्या टीम सोबत चार चाकी वाहनाने परतीच्या मार्गी लागलो.

मनात तेंव्हा एकाच विचार घोळत होता.
का म्हणून अशी वागतात लोक ? आपल्या आई - वडलांशी ?
म्हातारपणं हेही देवानेच दिलेली देणगी , ती पुढे आपल्यालाही मिळणारच ?
काही क्षण विचारांचं चक्र तेजीत चालू होतं.

एका क्षणी मन म्हणालं , परिस्थिती नि वेळ हीच मुळात माणसाला त्याच्या सहनशक्तीला , त्याच्या विचार वृत्तीवर , त्याच्या तना मनावर , आघात करत असते ...अन त्यानुसार बदल हा घडत असतो.
हाच निसर्ग नियम ............
गाडी ने वेग घेतला तसा राजगड नि त्या सगळ्यां आठवणी मनाच्या एकां कप्यात बंदिस्त झाल्या.....

संकेत य पाटेकर
२९.०१.२०१३
मंगळवार