किल्ले धोडप लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
किल्ले धोडप लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २४ डिसेंबर, २०१४

धोडप - इच्छा शक्ती - योगायोग अन स्वप्नपूर्ती

जग कितीही पुढे गेलं अन विज्ञानाने किती हि प्रगती साधली तरीही निर्सगनिर्मित अद्भुत गोष्टींचा अर्थ लावणे ,तो शोधून काढणे अजूनही तसं मानवाला शक्य नाही . शक्य होईल तेंव्हा त्याचे अजून काही चमत्कारिक, गूढतेने रहस्य्लेले रूपं पुन्हा आपल्या नजरे समोर उभे राहतील . कधी प्रश्नांची कोडी निर्माण करत तर कधी तना मनाला आनंदाच्या वलयांम्ध्ये मुग्धपणे खिळवून ठेवत . तर कधी निसर्गाच्या ह्या अलंकारित रूपाचं गुणगान गातं , मन मोकळेपणाने मनापासून कौतुक करत ....

काल असंच एक अद्भुत पण लोकांच्या मनी भक्ती भावनेने कोरलेलं श्रद्धामय ठिकाण पाहून आलो.
तसा तो योगायोगच जुळून आला अस म्हणायला हि हरकत नाही...
असे योगायोग आपल्या जीवनात घडतच असतातच म्हणा, आपल्या मनातली सुप्त इच्छा पूर्ण होण्यासाठी,,,
कधी कुणाची अकल्पित, अनाठायी भेट होवून... तर कधी काय नि कसं ..कुणास ठाऊक..
'इच्छा तेथे मार्ग' म्हणतात त्या प्रमाणे आपला मार्ग हि मोकळा होतो . रस्ता मिळून जातो.

कुठे तरी ऐकलेली, वाचनात आलेली एखादी गोष्ट प्रत्यक्ष डोळ्यसमोर आली तर ..
त्यातून मिळणारा आनंद हा शब्दात कसा मांडावा हा पहिला प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो .
तरीही आपला कसून प्रयत्न सुरु असतो ...तुटक मुटक शब्दात तो सांगण्याचा ...

माझा हि असाच एक प्रयत्न ...
अजिंठा - सातमाळा रांगेतील धोडप हा तसा एक बलदंड अन रेखीव किल्ला , अन उंचीनेही हि तितकाच उंच , आकार हि अगदी पिंडी सारखा , त्यामुळे भक्ती भावनेने अन श्रद्धेनेच त्याच यथार्थ दर्शन होवून जातं .

फोटो सौजन्य - प्रनील पाटेकर ..

नाशिक - वडाळा भोई फाट्यावरून - धोडांबे असा प्रवास करत हट्टी गावात पोहचलो कि अगदी हाकेच्या अंतरावर उभा असलेला धोडप . अर्धा एक तासात सहज चढून होईल हो, अस आपण फुशारकीने म्हणून जातो ..वेळेच मोजमाप करत , पण प्रत्यक्ष चढाई करतेवेळी लागणारा वेळ आपल्याला योग्य त्या मोज मापेच गणित आपल्या पुढे ठेवून देत. आपण गणितात किती शून्य आहे ते दाखवून देत .
तर असो.

उंच सखल भागातून, झाडी झुडपातून वळणा वळणाची पायवाट आपल्याला , शेंदूरचर्चित मारूतीच दर्शन देऊन , साधारण दीड दोन तासाच्या चालीने किल्याच्या माचीवर घेऊन जाते . तिथे आपण २ बुरुजाच्या प्रवेश द्वारापाशी येउन पोहोचतो ,येथून डाव्या हातीची वाट आपल्याला सोनार वाडीतून उजवीकडे वळणा घेत पुढे गडावर घेऊन जाते तर बुरूजा येथून डावीकडची वाट , आकाशाला गवसणी घालणार्या ईखार्या सुळक्या जवळ घेऊन जाते.

धोडप किल्ल्यावर बरेसचे अवशेष आहेत. ऐतिहासिक महत्व असलेले , पण त्यातल्या त्यात
एक नवलाईची गोष्ट सुद्धा आहे . किल्ल्याच्या पोटाशी दडून बसलेली ..
ती म्हणजे 'गाईची कपार' जिचा शोध आम्ही २ दिवस घेत होतो . जे कुठेतरी वाचलेलं अन ऐकलेलं ,
पण अखेर 'इच्छा तेथे मार्ग' म्हणतात त्याप्रमणे आम्हाला ते पाहण्याचा योग आला . अखेरच्या दिवशी परतीच्या वेळेस ...योगा योगाने ..,दत्तू नामदेव पवार ह्या काकांमुळे..

धोडप च्या पोटाशी सोनारवाडी च्या पुढे थोडं खालच्या अंगाला , एक नितळ , स्वछ पाण्याचा झूल झुलणारा, मनाला थंडवनारा एक झरा वाहतो ...बाराही महिने , त्याच्याच बाजूला कातळात एक खोदीव टाकं आहे, गणेशाची प्रतिमा असलेलं, ते त्या नितळ स्वछ झरयाने पूर्णतः भरून जातं. त्या पुढूनच एक वाट ... खालच्या दिशेने , झाडी झुडपातून , कातळ टप्प्यातून पुढे होत जाते .
साधारण १०-१५ मिनिटा नंतर आपण एका कपारी पाशी येउन पोहोचतो . येथे उभ्या खडकातलि एक भेग आहे . हीच ती नवलाईची जागा . भक्ती भावनेने पुजलेली .
'गाईची कपार' ...गाईचा हुबेहूब आकार ल्यायलेली कपार .

शाश्त्रा प्रमाणे (इथल्या गाव कार्यान नुसार )
फार वर्षा पूर्वी , गाय अन तिचं लेकुरवाळं वासरूं चरत असताना , दोघांची एकमेकांपासून तुटातुट झाली.
वासरू राहिलं ह्या कपारीच्या अल्याड अन गाय त्या पल्याड ..
आता इतक्या वर्षाने हि ती गाय आपल्या वासरू च्या ओढीने पुढे पुढे सरकत राहते . म्हणजे ती कपा रीतली जागा दर वर्षी इंचा इंचाने पुढे पुढे होत राहते . किती अद्भुत अन चमत्कारीक आहे ना ?
कुणाचा विश्वास बसेल अथवा नाही हि पण निसर्गातल्या अश्या कितीतरी अनभिद्न्य गोष्टी मनाला
नवलाईच्या दुनयेत अलगद घेऊन जातात .


हीच ती गाईची कपार..
फोटो सौजन्य - कला


क्रमश :-
संकेत पाटेकर
२४.१२.२०१४

_______________________________________________________________________________________________
_______________________________________________________________________________________________

ट्रेक दरम्यान आपल्यला अनेकविध क्षण अनुभवयास मिळतात.
त्यातलेच काही गमतीदार क्षण..

ट्रेक मधल्या गमती जमती ..धोडप


नाशिकच्या धोडप किल्ल्यावर मुक्काम करून नुकतंच हट्टी गावात परतलो . तेंव्हा दुपारचे साधारण साडेतीन वाजले होते . सूर्यनारायण माथ्यावरून थोडे पुढे कलले होते. आम्ही आलो तेंव्हा गावातली लहानगी इकडून तींकडे बागडत होती. त्यांच्या चेहर्यावरील निरागसपणा मनाच्या अंतरंगाला स्पर्शून जात होता.

धोडपच्या पायथ्याशी असलेलं हट्टी गाव , तशी परदेशी लोकांची वस्ती. परदेशी लोक म्हणजे आडनाव परदेशी . मुळात राजस्तानचे असलेल हे लोक फार एक वर्षापूर्वी म्हणजे त्यांच्या आजा पणजा पासून इथे स्थित आहेत . त्यामुळे त्यांची भाषा हि मिसळलेली अर्धी हिंदी अन मर्हाटी ...

तशी लोकांची राहणी हि साधीच..पण त्या साधेपणातच किती मधाळ गोडवा भरलेला असतो ते शहरी लोकांना कसे कळणार? घरात काही असून नसूनही केलेला उत्तम पाहुणचार, त्यांच्या बोलण्यातला आदार , आपलेपणा ,आपल्यासाठी सुरु असलेली मनमोकळी धडपड - हृदयातील स्पंदनांना हि काही वेळ थोपवून ठेवते.

अशाच एका परदेशी कुटुंबात , सकाळची ती कांदेपोह्यांची न्ह्याहारी , ती चव अजून हि जिभेवर रेंगाळतेय.
तर असो.
हट्टी गावात आलो तेंव्हा 'मावा' घेण्यासठी म्हणून आमची दोन एक जनाची लगभग सुरु झाली.
पुस्तकात वाचलं होत इथे मस्त अस्सल प्यूअर दुधाचा मावा - खवा काय तो मिळतो . म्हणून अनुरागने चौकशी केली. तर त्याला तिकडून 'ना' असा सूर ऐकू आला . त्याने तसं मग आम्हास सांगितल .

ते ऐकून बाजूलाच बाजीराव तटस्थ उभे राहिले.
बाजीराव म्हणजे आमच्या वाहन चालकाचे नाव हो . इतिहासाच्या पानात अजरामर झालेले अन हृदयाच्या कप्यात कोरले गेलेले ते बाजीराव अन आत्ताचे आमच्या समोर उभे असलेले हे बाजीराव.
नावात काय असत असं लोक म्हणतात खर ? पण बरंच काही असत हो नावात .
तर असो .. आमचा बाजीराव तसा आमच्यात मिसळून गेला होता.
अवघ्या काही तासाच्या प्रवसात हि कधी कुणी अगदीच आपल्यात मिसळून जात , अनमोल आठवणी देत तर कुणी काहीच न बोलता कायमच दूर निघून जातं हे आजवरच्या प्रवासदरम्यान मिळाले अनुभव....तसा हाही बाजीराव ..

गावात 'मावा' नाही हे कळल्यावर बाजीरावं समोर उभा , 'मावा' च हवाय ना? थोडं पुढे गेल्यावर मिळेल कि ,अस हळूच आवाजात अनुरागाशी बोलत त्याने काळी-पिवळी चार चाकी सुसाट पळवली .
हट्टी गावाचा निरोप घेत..धोडप कडे एक कटाक्ष टाकत , इखार्या सुळक्या कडून सुरु झालेली रांग नजरेत भरवत , कांचनचे कांचनमृगी राकट काया मनात साठवत आम्ही निघत होतो .आता पुन्हा कधी येऊ ? ह्यावर मनखेळी करत..

कधी खाच खळग्यातुन तर कधी सपाटी डांबरी रस्त्यातून ...
गाडीची चारी चाके हि स्वतःची झीज करत पलायन करत होती. . तेवढ्यात बाजीरावाने ब्रेक दाबले? अन ती काही अंतर पुढे करत स्थिरावली . बाजीराव हि गाडीतून उतरता झाला .
आमच्यातल्या प्रशांत दा , आमच्यातला मोठा दादा म्हणून अगदी अगतीकने सर्वाना ओरडून सांगितले, कुणाला काही घ्यायचं आहे का रे ? गाडी थांबली आहे तर ..
मग आमच्यातले दोघे चौघे प्रशांत दा स्वतः , कला , अनुराग अन मी . पाय मोकळे म्हणून अन काही घ्यावं म्हणून गाडीतून उतरते झालो.

नाशिकच्या ताज्या अन शुद्ध मातीतल्या स्वस्त भाज्या दिसताच त्याची जोरदार खरेदी सुरु झाली .
आज वर ट्रेक वरून परताना पहिल्यांदा अशी भाज्यांची शोप्पिंग करत होतो. त्यामुळे मनातून अगदीच खुश होतो. मनातल्या मनात म्हणत, चला घरातले खुश अन मी हि खुश...(पुढचे २ दिवस त्याचीच भाजी खात होतो म्हणा , कोंथिबीर वड्या काय , मेथीचे ठेपले काय, )

तर असो शोप्पिंग खरेदी वगैरे झाली. अन दुसर काही मिळत का म्हणून नजर शोधा शोध करत होती.
तेवढ्यात बाजीराव ने अनुराग ला वेढा दिला . शब्द टाकत..
मावा हवाय ना ? तो बघ तिथे मिळेल.

त्याच्या त्या बोलण्याने आम्ही दोघे तर आनंदानेच हवेत तरंगलो . कारण एकंदरीत ट्रेक मनासारखा झाला होता. फक्त 'मावा' च काय तो मिळाला न्हवता ..
त्यामुळे त्याच्या बोलण्याने आनंदुनच गेलो.

पण ज्यावेळेस त्याने हातवारे करत दिशा दर्शिवली तेंव्हा त्या ठिकाणे कडे पाहून हसूच आवरेना ...
ती पानटपरीची जागा होती......
- संकेत य पाटेकर
३०.१२.२०१४