गुरुवार, ३० जानेवारी, २०१४

रतनगड - प्रवास कालचा अन आजचा..


वार शनिवार २ तारीख , फेब्रुवारी महिना , वर्ष २०१३ , थंडीचे दिवस.
पहाटे ६ वाजले होते त्या दरम्यान कल्याणला शिवाजी चौकात वाफाळलेला चहा घेऊन आम्हा १० जणांचा समूह अगदी मोठ्या उत्साहात रतनगड च्या ओढीने ...गाणी वगैरे म्हणत ..ट्रेक साठी रवाना झाला.
त्याच दिवशी आमचा इंजिन, अनवट वाटेचा वाटकरू ...' लक्ष्मन उर्फ बाळू ' दा ह्याचा वाढदिवस.
त्यामुळे ट्रेक ला जाण्याचा उत्साह हा आणिक द्विगुणीत झाला. किल्ल्यावर जाताना केक वगैरे घेऊन जावू ...
अन वाढ दिवस हटके साजरा करू असे एक एक विषय बाहेर निघू लागले.
अशातच कल्याण मागे पडलं ...अन शहापूर गाठलं.

पोटाची खळगी भरावी म्हणून न्हाहारी साठी एका हॉटेल मध्ये उतरलो. मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. अन तासाभराच्या आताच पुन्हा इगतपुरी मार्गे रस्ता धरला.
आम्ही ६ जन मारुती रिट्झ मध्ये आणि उर्वरित चौघे दुचाकी वर ..
मस्त रमत गमत गाणी म्हणत प्रवास सुरु होता.एव्हाना शहापूर च्या पुढचा रस्ता गाडीने धरला होता .
पण त्याचवेळेस एकाकी वीज तड्कावी अन सर्वत्र भयान शांतता पसरावी तशी शांतात पसरली त्या फक्त एका call ने ..
फोन कडाडला, ते थरारक बोल कानी घुमले ...

संकेत Accident , Accident , थांब थांब .........

रक्त बंबाळ झालेला तो आणि त्याची ती किंकाळी ......
शहापूरच्या एका हॉस्पिटल मध्ये मित्राच्या पायाला डॉक्टर टाके मारत होते.
ते करत असता त्याच ते मोठ्यानं विव्हळण अजून आठवतंय ...
ते चित्र अजूनही तसंच नजरेसमोर उमटतं आणि अंग पुन्हा शहारतं ...!
कमरेपासूनचा खालचा भाग , डावा पाय त्याचा पूर्णतः सोलून निघालेला .
हायवे वर बाईक चालवत असता हा अपघात घडला . पण नशिबाने जीव वाचला . 
एका सोबत दुसर्याचा हि ....
त्यामुळे रतनगडचा तेंव्हाचा प्लान तिथेच रद्द करावा लागला . त्यानंतर तीन एक महिने तरी मी कुठे बाहेर पडलो नाही .
अपघातात सापडलेला मित्र जवळ जवळ ७-८ महिन्यांनी पुन्हा पूर्ववत झाला. त्यावेळेस सोबत असलेलेल्या मित्रांची हि फार मदत झाली .



ह्याच गोष्टीला आता वर्ष होणार होतं , म्हणून पुन्हा रतनगडचा बेत आखला . अन त्याप्रमाणे निघालोही ...
ठाणे - मुंबई - नवी मुंबई येथून आम्ही सहा जण आणि उर्वरित तिघे पुण्यावरून असा ९ जणांचा आमचा ग्रुप तयार झाला . शनिवारी पहाटे १२:१० च्या अमृतसर एक्सप्रेस ने आम्ही निघालो .
मी , आमचा इंजिन लक्ष्मन उर्फ बाळू दा , सिद्धेश घाडगे , तेज , अनुराग , आणि प्रनिल . अशी आमची तुकडी प्रवासाला निघाली.जाताना एक्स्प्रेसच्या सामान्य डब्यातून आमचा प्रवास होणार होता , त्यामुळे जरा शंकाच निर्माण झाली कि जागा मिळेल का ?
निदान उभ राहायला तरी , कारण कळसुबाई चा प्रवासी अनुभव गाठीशी होता .
तेंव्हा कसा तो प्रवास केला होता ते आमचं आम्हालाच माहित.... असो

तर म्हटलं आता आत शिरण्यास तरी जागा मिळेल का ? पण ज्यावेळेस ट्रेन फलाटावर आली अन फलाटावरील प्रवासाची संख्या जेंव्हा नजरेस पडली तेंव्हा म्हटलं चला जागा मिळेल अन त्याप्रमाणे ती मिळाली हि ....
आज पहिल्यांदा असा निवांत बसून प्रवास करत होतो.
आयुष्य हा एक प्रवासच आहे म्हणा , कधी धका धकिचा , संघर्षाचा तर कधी सुखकर असा ...
आमचा हा प्रवास मात्र सुखकर असाच होता .

ठाणे ते इगतपुरी ह्या प्रवासाने आम्हाला सारी सिनेसृष्टी फिरवून आणली. त्यात मग हिंदी तारके तारका ,मराठी कलाकार , महेश मांजरेकरापासून , भरत जाधव , भाऊ कदम ह्यांच्या पर्यंत ...सार्यांची भेट घडली. त्यातच कुणाला किती मानधन मिळतं , कशा प्रकारे मिळतं , कशासाठी मिळतं ह्याची सारी माहिती आम्हास मिळाली.
२ तासाच्या त्या प्रवासात नवा गडी प्रवासी भेटला त्याच नाव ' किरण' .
बॉलीवूड अभिनेता सनी देओल ह्याचा अकाउनटन्ट. त्यामुळे प्रवासात अजून रंगत आली. हा प्रवास यादगार ठरला तो त्यामुळेच ..
जाता जाता एकमेकांच मोबाईल नं . घेत आम्ही त्याला निरोप दिला . अन तो त्याच्या वाटेने त्याच्या गावी भुसावळ ला रवाना झाला.

इगतपुरीच्या फलाटावर गाडी थांबली अन आम्ही पायउतार झालो. तेंव्हा रात्रीचे अडीच वाजले होते. अजून पुष्कळ वेळ होता .
पहाटे ५ ची एसटी होती. इगतपुरी एसटी स्थानकातून , पुढचा प्रवास त्या एसटीनेच होणार होता शेंडी गावापर्यंत. त्यामुळे गप्पांच्या दुनयेत आम्ही स्वतःला झोकून दिले.
अन बरोबर साडेचारच्या टोल्याला आम्ही इगतपुरी डेपोच्या दिशेने वाटचाल सुरु केली .
अन गप्पांच्या ओघात एसटी स्थानकात पोहोचलो हि ..

ठरल्या वेळेप्रमाणे एसटी हि ५ ला न येता आळस करत १५ मिनिटे उशिराच दाखल झाली .
ते हि अंगभर शिडकावलेल्या पाण्याचा थेंब जराही न पुसता ,,, इतकी घाई ...
सर्वत्र पाहावं तर आसनावर पाण्याचे थेंबे थेंबे तळे साचलेले , ते पुसण्याची तसदी त्या एसटी कर्मचाऱ्यानी घेतली नाही .
एसटीला न्हाउ घातले पण बसण्याचा जागा तश्याच ओल्याचिंब...
पहाटेची थंडी आणि त्यात हे ..अस .., थंडीचा आस्वाद घेतला तो असा ......

बरोबर साडे सहा वाजता हलत डुलत वेड्या वाकड्या वळणाने आम्ही शेंडी गावात पोहोचलो. तेंव्हा हळू हळू काळोखावर प्रकाशाचा अंमल सुरु होत होता . धुक्याची दाट चादर मात्र अजूनही तशीच पसरली होती. त्यामुळे गरमागरम चहाचा घोट घ्यावा असे मनोमन वाटत होते.
जिथे उतरलो तिथेच एका कोपरयाला चहाची टपरी होती . त्यामुळे थंडीने भरलेली हुडहुडी त्याने पार निघून गेली.
पुढे गरमागरम चविष्ट कुरकुरित अश्या कांदा भजीवर ताव मारला. अशातच एक नवी गोष्ट कळली. त्या भजीवाल्या काकांकडून ते म्हणजे
' गुगल भजी '
आजवर कांदा भजी , बटाटा भजी , मुग भजी , पालक भजी इथपर्यंत मला नाव ठाऊक होती.
अन त्याचा आस्वाद हि मध्ये मध्ये घेत असतो म्हणा . पण ...गुगल भजी हा काय प्रकार आहे बुवा ?
काही कळेना ? गूगल वर बघा म्हणजे कळेल ..., इतकं मी ऐकल . बंस (म्हणजे किती फ़ेमस भजी आहे बघा हि ),,, हीच भजी आमच्या इथे जास्तकरून खपते .
अस त्यांनी सांगितले .
म्हटल ठीक आहे रविवारी येता येता चाखून बघू त्या भजीची चव . आणि काय प्रकार तो .
तुम्ही कधी खाऊन पहिले का अशी भजी ? वा अस नाव तरी ऐकल आहे का ? असल्यास सांगा बर ..
कळू द्यात जरा ...

शेंडी गाव हे तसे प्रवरा नदीच्या काठावर वसलेल . भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळच ..
येथून रतनवाडी हे (रतनगडच्या पायथ्याच गाव) रस्ता मार्गे वीस एक किलोमीटर अंतरावर आहे .
येथून जाण्यासाठी जीप ची सोय होते. तसेच होडीची सफर हि करता येते , पण तिची वेळ सध्या दुपारी १२ ची आहे . अन पाण्याची पातळी कमी असल्याकारणाने ती प्रवासी बोट आपल्याला रतनवाडीच्या खूप आधी म्हणजे जवळ जवळ चार एक किलोमीटर पुन्हा चालत जावे इतपत आपल्याला आणून सोडते. त्यामुळे तिने जाण्याचा आमचा मनसुबा तिथेच वीरघळला.
आम्ही शेंडी गावात उतरलो तेंव्हा ' राजू काळे ' हे तिथलेच स्थानिक असलेल्या काकांची भेट झाली .
अन त्यांची स्वतःशीच चार चाकी होती . त्यामुळे योग्य ते भाडं ठरवून(१३०० रुपये जावून येउन ) आम्ही रतनवाडी कडे मार्गीस्थ झालो .त्या अगोदर भंडारदराच निसर्गरम्य परिसर पाहून घेतला नजरेच्या तीक्ष्ण धारेनी ..मनाच्या गाभाऱ्यात...कायम स्वरूपी ..





साधारण ९ च्या आसपास , चढण उतरणं करत , वेडी वाकडी वळणे घेत , डोंगर दर्यांच्या कुशीतून आम्ही रतनवाडीत प्रवेश केला . अन एक एक करत गाडीतून उतरलो .
तोच समोर प्रशस्थ अशी पुष्करणी नजरेस पडली. आणि एका बाजूस अमृतेश्वरच सुरेख सुबक अस कोरीव मद्निर .त्याच कळसा पासून पायथ्यापर्यंतच दर्शन .
ते सगळ पाहून मन भक्तिमय झाल्याशिवाय राहत नाही . मनोमन देवाचा धावा ( जप )सुरु होतं .

मन त्यातच गढून जातं .


दूर वरूनच आम्ही सर्वांनी शिवाच दर्शन घेतलं. कारण माघारी येताना मुबलक वेळ मिळणार होता .
त्यामुळे अधिक वेळ न दवडता पाच दहा मिनिटातच आम्ही ट्रेक ला सुरवात केली.
चालता चालता समोरच सह्याद्रिच रांगड रूप मनास भुरळ घालत होतं .
डावीकडून सुरु झालेली डोंगर रांग त्यामधून डोकावणारा कात्राबाई कडा मधोमध रतनगड आणि त्याच्या उजवीकडे खुटा.....अन त्यापुढे अंतर अंतर सोडून उभे ठाकलेले एक एक डोंगरकडे ...हा सर्व निसर्गाचा अविष्कार ...बस्स, अजून काय हवंय...

पायाखालची माती तुडवत तर कधी दगड धोंड्यातून मार्ग काढत ,
कधी प्रवरेला समांतर अस चालतं तर कधी तिचं सुखलेल पात्र व्याकूळ नजरेन पाहतं ,
मनात तिच्याविषयी, तिच्या पावसाळी रूपांच खळखळत मनोचित्र रेखाटत ,
रानावनातून , उन सावलीच्या स्पर्शाची सुसंगत ...
मोकळा द्रीघ श्वास घेत , कधी धापा टाकत ..क्षणभर विश्रांतीचे क्षण मोजत पुढे मार्गीस्थ होत होतो .
मजल दरमजल करत पुढे सरकत होतो .
पुढे वाटेत एका ठिकाणी हरिश्चंद्र गड अन रतनगड ला जाणारी पायवाट फुटली .
तिथला लोखंडी फलक तशी माहिती पुरवीत होता .त्या बाजूला न वळता ह्या बाजूला वळा म्हणजे रतनगडच्या माथ्यावर पोचता येईल तुम्हाला बाळांनो ,,,,अस जणू पटवून सांगत होता . उजवीकडची वाट हि रतनगडला तर सरळ जाणारी पायवाट धरली तर सिधा हरिश्चंद्र गडला . असा तो दुहेरी संगम होता .
तिथून काही पाउलं पुढे टाकली अन धापा टाकत एका विशाल खडकावर निद्रिस्त झालो काही एक मिनिटे .
आमचा सिद्धेश एका वर्षाने ट्रेकला आला होता , म्हणून त्याचा वेग हि काहीसा मंदावला होता .
पण उत्साह मात्र आहे तसाच दांडगा होता . तरतरीत ......टवटवीत .
काही वेळ आम्ही तिथे विश्रांती घेतली अन पुन्हा ताजेतवाने होतं पुढचा मार्ग अवलंबला .
तोच एक दोन मिनिटातच अनेकानेक ब्लोग मधून वाचलेल्या त्या लोखंडी शिड्यांचं दर्शन घडलं.


तेंव्हा मनातल्या आनंदाला पाझर फुटलं ते वाहू लागलं. बिन्धिक्त ओरडू लागल.
अरे मित्रहो , बघा आपण आलो , येस...येस पोहोचलो ....बस्स आता अवघे काही मिनिटे......

आता पोहोचणार ह्याच भावनेने मन किती उचंबळून येत. आनंदाचा प्रवाह वाऱ्यामाफीत ओसंडत वाहत.
दोन लोखंडी शिड्या चढत आम्ही गणेश दरवाजा गाठला .


त्यातून आत प्रवेश करत , गणेशाच्या प्रतिमेला वंदन करत,, पुढची शिडी गाठली . अन त्यावरच्या दगडी पायवाटेने वर किल्ल्यावर प्रवेश केला.
वर जाताना डावीकडची वाट हि दुसर्या दरवाजातून, अग्नीबाण सुळका नजरेत सामावत , कात्राबाईचा मनोवेधक कडा न्हाहाळत आजापर्वतचा उंच माथा निरखत , राणीच्या हुड्या येथून नेढ्या कडे वळत होती.
तर उजवी कडची वाट त्या दोन गुहेकडे .जिथे आजचा आमचा मुक्काम होणार होता .

आमच्या सोयीप्रमाणे आम्ही दोन्ही गुहा व्यावस्थित पाहून घेतल्या . तसे पहिले तर आम्हीच प्रथम गडावर पोहोचलो होतो , इतर कुठला हि ग्रुप अजून तरी आला न्हवता . त्यामुळे कुठे मुक्काम करायचं ते सर्वस्व आमच्याच हाती होतं.
दोन्ही कडच्या गुहा निरखून आम्ही आमचा मुक्काम मोठ्या गुहेत न ठेवता , छोट्या गुहेत रत्ना देवीच्या मंदिरात करायचं ठरवलं.
कारण मोजून आम्ही ९ जण , त्यामुळे त्यात माऊ शकत होतो. अन ती गुहा हि स्वच्छ नि साफ होती .
त्यामुळे पाठीवरल्या Sack आम्ही एका बाजूला ठेवत खांद्यावरच भार कमी केल.
त्याआधी आम्ही मोठ्या गुहेजवळ पोटपूजा उरकून घेतली होती .

मग पाण्याच्या सोयीसाठी म्हणून तिथे उपस्थित असलेल्या काकांकडे पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून चौकशी केली.

दर शनिवार रविवार ट्रेकर्स मंडळीसाठी धान्याचं भार आपल्या डोक्या खांद्यावर उचलत दोन ते अढीच तासाची पायीपीट करत ते गडावर मुक्कामास येतात.
त्याचं नाव ' नथु झडे' पायथ्याच्या रतनवाडीचे. आपल्या पत्नीसमवेत त्यांचा इथे मुक्काम असतो दर शनिवार - रविवार . आपल्या सारख्या ट्रेकर्स मंडळींसाठी , त्यातूनच त्यांना दोन पैसे मिळतात .

त्यांच्याकडे चौकशी करता , गुफेच्या वरचं पाण्याची टाकी आहे अस कळलं अन मग त्यासाठी रिकाम्या बॉटल्स हाती घेऊन आम्ही आठ मावळे (एकास गुहेची निगा राखण्यास म्हणून ठेवून घेतले . कारण माकडांचां उपद्रव फार मोठा तिथे .. ) हनुमान दरवाज्यातून त्यावर असलेले शिल्प न्हाहाळत किल्ल्याच्या दक्षिण टोकाला आलो. तेंव्हा समोरच्या त्या दृश्याने मनाला एक सुखद धक्का दिला.




शब्द नकळत बाहेर पडले ..... अप्रतिम ..... ..केवळ अप्रतिम ..... !

निसर्गाने स्वतःला इतकं सुंदर बनविल आहे , कि त्यापुढे कुणीहि लुब्ध होईल . ठार वेडा होईल.
त्यापुढे आपलं सर्वस्व बहाल करण्या इतपत .
सौंदर्याचे , प्रेमाचे अन प्रेमजीवनाचे धडे गिरवायचे ते त्याच्याकडून ..
गर्व नाही हो , कोणत्याच गोष्टीचं , जे आहे ते इतरांत वाटून टाकायचं , देणं फक्त ते जाणतं.
पण त्याच्याही मर्यादा काही तो आखून आहेच . नाहीतर माणूस नावाचा प्राणी लुट करयाला तत्परच असतो म्हणा .





असो तर निसर्गाच ते सौंदर्य मनात साठवत आम्ही राणीच्या हुड्या कडून वर आलो. 
अन गुहेच्या समांतर वर रेलिंग लावलेल्या ठिकाणापासून चालू लागलो. थोड्याच पुढे स्वच्छ नितळ पाण्याचं टाकं लागल. त्याच्या शेजारीच एक शिवलिंग होतं . 
त्याच दर्शन घेत , पाण्याच्या टाक्यातून एक एक बॉटल भरत पुन्हा गुहेकडे निघालो.

गुहेत पोहोचलो तेंव्हा सिद्धेश हाती काठी घेऊन उभा होता .माकडांनी त्याची झोप उडवली होती .
त्यामुळे दारातच तो काठी हाती घेऊन ठाण मांडून होता .

एव्हाना एक ग्रुप गडावर मुक्कामास आला होता. आणि त्यांचा भोजनाचा जंगी कार्यक्रम सुरु होता .
इथे मुद्दाम जंगी म्हणतोय कारण मद्याचा पेला त्या प्रत्येक जणांकडे होता . आणि तेच ते ढोसत होते .
११ जणांचा तो ग्रुप ,,, केवळ पिकनिक म्हणून मौज मस्ती साठी अन दारू ढोसण्यासाठी आला होता .
ते सर्व पाहून काहीतर करावं बोलावं ह्या उद्देशाने मी त्यांना विनंती केली.

हा आपलं ऐतिहासिक ठेवा आहे. अन अशा ठिकाणी दारू वगैरे ,,, प्लीज अस पुन्हा कधी करू नका .
त्यातल्या एकाने उत्तर दिलं. ते हि पेंगत पेंगत..

'' दादा , इथली माकडे ना , माकडे आम्हाला त्रास देतात खूप म्हणून प्यालो आम्ही "
काय म्हणावं अशा लोकाना . आणि अशा बेवड्यांच्या नादी लागून तरी काय उपयोग .
उलट आपलाच दिवस खराब जायचा . 
त्यामुळे तेवढी ती एक प्रेमाने विनंती करून आम्ही गड फेरीस बाहेर पडलो.


ते नेढ्याच्या दिशेने ...


अन इथेच त्या नेढ्या पाशी ते थरार नाट्य घडलं. ज्याला आम्ही सर्व साक्षी होतो .
कारण ते नाट्य आमच्या भोवतीच आमच्या संबंधित घडलं होतं.

ते इथे काव्यशब्दरूपात मांडत आहे . पुढे सविस्तर सांगेनच ...कारण Picture अजून बाकी आहे बॉस

माकडाला आली लहर ..नि त्याने केला कहर ...

गेलो होतो सर सर , अतिवेगवान चाल करून
उंच होता नेढा तो , म्हटलं विसाऊ तिथे क्षण तरी
तेंव्हा दिसला तो पहारेकरी , दम दाटी करू लागला
का आलात इथे तुम्ही ? आता नाही तुमची खैरात खरी
होती जागा अरुंद , तिथे सारेच आता थबकलो
चिंचोळ्या त्या जागेवारती आम्ही सारे अडकलो
एक सीडे दरी मोठी , एक side उंच कडे
जागा नाहीच कुठे , आता पळती भुई कुठे
आला तो रुबाबातच , अन दम दाटी करू लागला
निमूटपणे उभं राहण्यातच शहाणपण आमचा जाहला
काय आहे जवळपास , ते चपापू लागला
हात वर उगारू , तर सुळे दाखू लागला
हिम्मतच होईना आमुची म्हटलं काय करायचं ते कर बुवा
निमूटपणे उभ राहण्यातच आमचा तो जीव खरा
जे जे होते समीप ते , ते ते त्याने पहिले
माकडाचे असे रौद्र रूप पहिल्यांदा आम्ही जाणले
सुटलो कसे बसे , कसे बसे उतरलो ,
माकडाचा विषय मोठा , त्या विषयातच गुंतलो
भूख हि असे वेडी पीसी , तिथे प्रत्येकजण हतबल होतो
माकडाचं काय राव माणूस पण कधी राक्षस होतो

२० मिनिटाचा खेळ तो , खेळ जिवावरचा होता खरा ...
पण शिकवून गेला आम्हांस जीवनाचा एक धडा... 
______________________________________________________________________________
मावळती सप्तरंगी छटा तना मनाला स्पर्शून डोंगर दर्यांच्या कुशीत एव्हाना निद्रिस्थ झाली होती. 
सूर्य नारायणाने आपल्या परंपरेनुसार वर्षा वर्षानुसार सुरु असलेले त्याचे मंगलकार्य आज हि यथेच्छ पार पाडत धरणी माईची रजा घेतली होती . उ
द्या पुन्हा नवं आशेचे सकारात्मक किरणे सोबत घेऊन..परतण्यासाठी ...इथल्या लेकुरवाल्यांसाठी...
आम्ही तेंव्हा रत्ना देवीच्या गुहेमध्ये रात्रीच्या जेवणाच्या खटपटीत आप आपल्या sack मध्ये डोकावत जे हाती येईल ते साहित्य बाहेर काढत जेवणाच्या तयारीस लागलो होतो.

माकडांचा हैदोस एव्हाना थोडा कमी झाला होता . ते हि त्यांच्या घरट्याकडे निघून गेले असावेत. 
कारण हळूवार अंधाराचं साम्राज्य चहु दिशेला आपलं बाहू पसरत होतं.

काही तासापूर्वीच नेढ्यात घडलेलं थरार नाट्य मात्र अजूनही मनाशी खेळत होतं . कधी त्यात हसू असे तर कधी भय ...अन जर तर च्या गोष्टी . जर काही अपघात घडला असता तर ...., 
कुणाच्या जिवाच बरेवाईट झालं असत तर ..मनाचं मनाशीच द्वंदसार सुरु होतं .

दुपारी ४ च्या सुमारास आम्ही आमच्या सर्व sack त्या काकांकडे ठेवतं नेढ्याच्या दिशेने निघालो.
गणेश दरवाजातून आत , पुढे राणीच्या हुड्याला उजवीकडे ठेवत , पाण्याच्या टाक्यांन कडून मळलेल्या वाटेने ...भव्य दिव्य कडे पाहत . निसर्गाच साजेरं रूप न्हाहाळत. ..पायाखाली गवतांच्या पाती तुडवत ...
कोकण दरवाजाकडून पुढे ...... ...पुढे .....अन पुढे....

वाटेत पाण्याच्या काही टाकी दिसल्या अन त्या पुढे काही अंतरावर एक भुयार..
अशा भुयार , पेब चा किल्ला , मृगगड ह्या ठिकाणी हि पहिल्या आहेत . 
अशा भुयारात जाणं म्हणजे एक प्रकारच धाडसच म्हणा . हाती टोर्च घेऊन , त्या चिंचोळ्या जागेतून आत शिरते वेळी मनाची पार थरथराट उडते .
एकीकडे मन घाबरत तर एकीकडे पुढे काय आहे ? ह्याची उत्सुकता मनास एक प्रकारे बळ प्राप्त करून देते .
पण ते बळ फार काल टिकत नाही . कारण त्या चिंचोळ्या वाटेतून चटकन मागे फिरणं शक्य होत नाही .
पाउल जशी पुढे पडतील तशीच मागे फिरकावी लागतात. 
त्यामुळे एखाद आणीबाणीचा प्रसंग उद्भवलाच तर ..........विचारूच नका ..... एक प्रकारे भीतीच ती ...

त्यामुळे काही गूढ ते गूढच राहत. त्याचा उलगडा होत नाही . आम्हाला त्यावेळेस मृगगड च्या गुहेचा उलगडा करता ला नाही . कारण दूरपर्यंत तिचा मार्ग जात होता अन त्यास पुढे फाटे हि फुटत होते . त्यामुळे आलो तसा मागे फिरलो होतो. मात्र पेब चं भुयार आतून पूर्णपणे निरखून झालं होतं .
तर असो ...
इथे हि त्या भुयारात सर्वत्र अंधार पसरला होता . 
त्यामुळे हाती टोर्च घेऊनच त्याच्या प्रकाश झोतेत आम्ही एक एक पाउल पुढे सरकू लागलो. 
गळ्यातले तर्हेवाईक शब्द बाहेर फेकत ...
समजा कुणी एखादा वन्यजीव आत असलाच तर त्या आवाजाने ,आवाजाच्या दबक्याने बाहेर येईल . 
किंव्हा  कुणी आत असल्याची जाणीव तरी होईल . उगाच पुढे काही गोष्टी जिवावर बेतण्या पेक्षा आधी अशी खात्री करून घेतलेली बरी ....
पण पुढे कुठल्याही प्रकारचा वन्यजीव वा सरपटनारा प्राणी दिसला नाही . आत मात्र एक स्वछ नितळ पाण्याचं टाकं अन एक गुहा नजरेस पडली.  मात्र त्या गुहेतीला माती सर्वत्र उकरलेली दिसली. 
कुणा एका पक्षा प्राण्याचा वास्तव्य तिथे नक्कीच असावं. ..ह्याची ती खुण होती.
.
पुढे त्या भुयारातून बाहेर पडलो अन ट्रेक्षितीज च्या नकाश्यावर काय काय पाहिलं ते अधोरेखित करत नेढ्याकडे आम्ही वळलो,दुरूनच ते निसर्ग निर्मित नेढे लक्ष वेधून घेत होते .
समोर अलंग मदन कुलंग ची डोंगर रांग मनास साद घालतं होती तर डावी कडे साम्रद, सांधण दरी , आठवनीचं सारं पाजत मनाला ढेकर देत होती .
काही एक वर्षा पूर्वी सांधण दरी ला भेट दिली होती . तिचं अचंबित करणार निसर्ग सौंदर्य अजूनही मनास खिळवत होतं.

आकाशी स्पर्धा करता करता उंच एके ठिकाणी स्थिरावलेले ते काळेकभिन्न कातळ कडे , त्यातून दिसणारे विस्तीर्ण आकाशाचे निळेभोर छत , त्या छताखालून लहान - मोठाल्या दगड धोंडयातून , अधे मध्ये कमरेईतपत साठलेल्या थंडगार पाण्यातून मार्गीस्थ होताना सुरु असलेली तना मनाची धडपड.
त्यांतच मित्रान सोबत केलेली धम्माल अजूनही आठवत होती. टपोरया चांदणीची ती रात्र अन वायू लहरींची ती अंगाई अजूनहि कानाशी गुंजत होती. तना मनाला शिवशिवनारा गारवा अजूनही अंगात हुडहुडी भरवत होता.
सारं काही नजरेसमोरून फिरकत होतं . जणू वाटावं आताच येथून झेप घ्यावी. सदा न सदा खळखळत
वाहणारया त्या आनंदी दरीकडे ......अन विसरून जावं स्वतःला निर्सगाच्या अद्भुत
अलंकारित सौंदर्यापुढे .
शब्द असे गुणगान गात होते त्या सांदण दरीचे ..त्या अलंकारित सौंदर्याचे ..
ठाई ठाई निसर्गाचे असे चमत्कारिक रूप जेंव्हा पाहण्यास मिळते तेंव्हा स्वतःचे भान हरपून जाते . हे काही सांगायला नको .
- क्रमश :-

क्रमश :- उर्वरित भाग लवकरच ....
तुमचा ह्यावर अभिप्राय नक्की कळू द्या .....

धन्यवाद
आपलाच
संकेत उर्फ संकु .





शुक्रवार, २० डिसेंबर, २०१३

स्वप्नं ...... जेव्हा सत्यात उतरते


सफर वनदुर्ग वासोट्याची अन मकरंदगड-प्रतापगडाची.....
















जीवन हे अनेक स्वप्नांनी, इच्छा आकांक्षांनी रंगलं आहे ,सजलं आहे . अन त्यामुळेच जीवन जगण्याला एक अर्थ आहे .
तसं प्रत्येकाच एक स्वप्न असतं. अंतरंगात उमटलेले , मनी साठलेलं...

त्या स्वप्नांना अनुसरूनच जो तो हे जीवन रंगवत असतो. 
निरनिराळ्या रंगानी . ते स्वप्न सत्यात उतरावं , ते पूर्णत्वाला जावं ह्यासाठी सतत धडपडत असतो . 
 सामोरी येणारी जड अवघड आव्हाने हि तो पेलण्यास सदा तत्पर असतो. तसं पहायला गेल्यास प्रत्येकाचं स्वप्न ' निराळं' , अन त्याप्रमाणे येणारी आव्हाने हि त्या प्रमाणे निरनिराळी . 
यशाची उत्तुंग शिखरे पदो पदी गाठावी . स्वप्न साकार व्हावं अस प्रत्येकाला वाटत .
तसे मला हि ..वाटतं. 

माझ हि आयुष्य अशा अनेक स्वप्नांनी रंगल आहे. त्यात हे '' गड - कोट किल्ले'' एक.
महाराष्ट्रातील एकूण एक किल्ले पहावे, तिथला इतिहास जाणून घ्यावा , 
तिथल्या वास्तू बारकाइने निरखून  घ्याव्यात ...
तिथल्या निसर्गाशी गुज गोष्टी करत त्या वातावरणाशी अगदी संलग्न होवून जावे असे सतत वाटत राहते . 
आणि हे वाटनेच मला दर शनिवार रविवार माझ्या पाउल वाटेने माझ्या स्वप्नाच्या दिशेने घेऊन जाते. .

असंच , एक कित्येक दिवसापासूनच स्वप्न होतं. मनी साठलेले , वनदुर्ग वासोटा ची सफर करायची -
निबिड अरण्य , वन्यश्वापदांचा मुक्त वावर, एकीकडे शिवसागराचा मनाला थक्क करणारा अथांग जलाशय , हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्याची आठवण करून देणारा बाबू कडा, त्याच भव्य दिव्य रूप , नवीन वासोटा , जुना वासोटा , नागेश्वराची गुहा . 
वासोट्याबद्दल वाचनात आलेले अनेकानेक ब्लॉग तिथला थरार , तिथला इतिहास इतकं सार वाचून ऐकून तिथे जाण्याची उत्सुकता तर शिगेला पोहोचली होती.

म्हणून कधी एकदा वासोटा करतोय , कधी एकदा तो योग जुळतोय ह्याचीच अति आतुरतेने वाट पाहत होतो , अन काही हि म्हणा जर मनापासून इच्छा असेल , आणि त्या उपरवाल्याचा वरदहस्त असेल तर मनातली ती सुप्त इच्छा पूर्ण होण्यास वेळ लागत नाही .

एके दिवशी असंच बहिणीला फोन आला पुण्यावरून ...पुण्यातले पराडकर काका बोलत होते,
वासोटा करायचा आहे , नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये ? तयार आहात ना ? काय ते ठरवा अन सांगा ?

बस्स इथपासून आमची सुरवात झाली ........आमच्यातल्या ' क ' ह्या प्रश्नसंचाची. 
कोण कुठे ?काय नि कस ?किती ? वगैरे वगैरे ....एकमेकांना विचारन सुरु झालं. 

त्यात भेटी गाठी होऊ लागल्या . अन सर्वतोपरी एकमताने डिसेंबर ची ६-७-८ ह्या तारखेवर शिक्का मोर्तब झाले.
आमच्यातला पुढारी ' यतीन' ने ह्यात पुढाकार घेत ट्रेक चे व्यवस्थित नियोजन केले .

९ जणांचा आमचा चमू वासोटा (सातारा) ट्रेक साठी तयार झाला. त्यात यतीन , रश्मी , संपदा , सुशील , सुशांत , मयुर , लक्ष्मन , हेमंत नि मी होतो. 

गुरवार दिनांक ५ डिसेंबर ला रात्री ९:२५ ची कल्याण हून महालक्ष्मी एक्स्प्रेस ने सातारा गाठायचे ठरले होते. 
त्याप्रमाणे आम्ही सर्व ९:१५ पर्यंत कल्याण स्थानकात पोहचते झालो. ( एक मित्र वगळता, त्याला येण्यास उशीर झाल्याने , ९:२० ला कल्याण हून सुटणारी ट्रेन सुटली नि त्याला खाजगी वाहनाने सातारा गाठावे लागले .)















पहाटे ३ वाजून १७ मिनिटाला आम्ही सातारा स्थानकात पाउल ठेवले , तेंव्हा थंडीने अगोदरच आपले बाहू सर्वत्र पसरले होते . तिच्या मगर मिठीत सारेच आले होते . त्यामुळे कुणाची कुडकुड हूडहूड चालूच होती.

सातारा रेल्वे स्थानकात तशी फारशी वर्दळ न्हवती. मोजता येतील इतकीच माणसे होती
नाही म्हटले तरी पहाटे ३:२० ला इतक्या लवकर कुठे वर्दळ असणार हो .
असो , तसा अजून बराच वेळ होता म्हणा . पहाटे ५ वाजून ३० मिनिटाची ची ,सातारा एसटी डेपो मधून बामणोलीसाठी एसटी होती. त्या एसटी तून आमचा पुढचा प्रवास होणार होता.
काही वेळ आमचा असाच इकडच्या तिकडच्या गप्पात निघून गेला अन क्षणभरात एक चार चाकी वाहन (क्रुझर ) आम्हाला घ्यायला आली.


तसे ठाण्याचे आम्ही ९ ट्रेकर्स आणि पुण्यावरून काही जण येणार होते , थांबा किती ते आकडेमोड करतो , एक पराडकर काका (गुरुजी) , ते दिघे भाऊ , ती छोटी , राहुल , अक्षय , सागर , आणि ते दोघे असे , हा असे दहाजण. म्हणजे आम्ही सर्वमिळून १९ जण होतो .

दिलीप पराडकर (काका) -
आणि त्यांचा ग्रुप , खर तर पराडकर काका आज आम्हाला दोन वर्षांनी भेटणार होते. 
दोन वर्षापूर्वीची त्यांची आमची भेट ती हि काही अवधीचीच , सिद्धगड - भीमशंकर ट्रेक दरम्यानची .पण त्या भेटीत त्यांचा प्रभाव आम्हावर (विशेषता माझ्यवर ) न पडो म्हणजे झाले.

जवळ जवळ पाउने तिनसे किल्ले त्यांनी सर केले आहे . आणि त्यामुळे त्यांच्याकडे माहितीचा साठा हि तितकाच .आणि ते आम्ही सिद्धगड - भीमाशंकर ट्रेक दरम्यान अनुभवल होत . ऐकल होत.
पेशाने ते तसे शिक्षक ,अन सह्याद्री वर त्याचं मनापासून प्रेम . म्हणून रानं वन पायदळी तुडवत त्यांची भटकंती सतत चालू असते . सर्व जण त्यांना गुरुजी म्हणतात . आम्ही मात्र काका . :)

आज त्यांच्यामुळेच खर तर वासोटा करायची संधी मिळाली होती.
आमच्या आधीच ते पुण्याहून साताऱ्याला त्यांच्या एका ओळखीच्या ठिकाणी (घरी) येउन पोहचले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत आलेली क्रुझर (चार चाकी वाहन ) आम्हाला आणण्यास पाठवली.

साधारण ४ दरम्यान आम्ही सातारा रेल्वे स्थानक सोडले . आणि चार चाकी वाहनाने (त्या क्रुझरने ) पुढे एसटी डेपो कडे सरकायला लागलो . आमचा एक मित्र हेमंत (ज्याची ट्रेन सुटली होती ) काही मिनिटातच सातारा एसटी डेपोत पोहचता झाला . त्याला सोबत घेऊन आम्ही ते (ते सर्व पुणेकर )जिथे मुक्कामी होते त्या घरी पोहचलो. खर तर एसटीने सिधा बामणोलीला जायचा आमचा प्रस्ताव होता .पण नंतर तो प्रस्ताव मोडला नि एकत्रित कसे बसे जागा करत एकमेकांना सांभाळत आम्ही त्या क्रुझरनेच त्या पाहुण्या घरी पोहोचलो.

तिथे थोडी विश्रांती घेऊन अन गरमा गरम चहाचा घोट घशात ओतून नि त्याबरोबर गप्पांचा ओघ तिथेच ठप्प करत आम्ही ६ दरम्यान तिथून बामणोली कडे प्रस्थान केले.
जाता जाता अजिंक्य ताराची नजरभेट घेऊनच ..

पुढे हळूहळू गाडीने जसा वेग धरला अन वेड्या वाकड्या वळणावरून घाट वाटावरून जशी ती पुढे धावू लागली.
तसं तसे दूरवरचे डोंगर दर्याचे विहिंगमय दर्शन मनाला साद घालू लागली .
त्यातच उगवत्या सूर्य नारायणाचे ते सप्तरंगी छटा मनास अधिक झुलवू लागले आनंदाच्या मुक्त लहरीत .

हा निसर्ग ..किती अद्भुत आहे बघा ! त्याच रूप त्याच सौंदर्य ,त्याच रहस्य कशा कशालाच तोड नाही .
किती बर घ्यावं त्या कडून ,
किती तरी शिकावं त्या कडून
नुसतंच टकमक पाहावं कधी ,
नुसतंच कान टवकारून ऐकावं कधी
शिकवेल तो रंग जीवनाचा
दरवळेल स्नेह हर्षाचा !
- संकु



निसर्गाची ती किमिया , ती नवलाई मनात साठवून ठीक ७:३० वाजता आमची गाडी बामणोली ला पोहोचली.
जवळ जवळ तास दीड तासाच्या त्या प्रवासात निसर्गा च्या सौंदर्या सोबत गाडीत सुरु असलेल्या उलट्यांचा गंधाचा देखील आस्वाद लुटता आला .(आता 'आस्वाद लुटता आला' ह्या शब्दापलीकडे दुसरा 'शब्द' काही सुचला नाही हो , तुम्हाला काही सुचतय का ? सुचलं तर सांगा )

गाडीच्या उजव्या डाव्या बाजूच्या खिडकीत एक सागर नि एक अक्षय आपल शीर बाहेर काढून ओकन्याचा कार्यक्रम अधे मध्ये चालू ठेवतं.:P :-) त्यामुळे इतर काही म्हणजेच मी नि मयुर आम्हाला सुद्धा पोटात मळमळायला सुरवात झाली .
(कस असतं , कधी कधी दुसर्यांच्या उलट्या पाहूनही आपल्याला उलट्या होऊ शकतात नाही का ? )पण अधे मधे ब्रेक घेतल्या कारणाने आमची विकेट पडायची राहिली .

असो ...
वासोट्याला जाताना बामनोलीत उतरून वन अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेऊन मग पुढे जावे लागते. आमची गाडी बामणोलीला पोचताच यतीन आणि फिरोज काका परवानगी घेण्यासाठी तिथेच थांबले. आणि इतर आम्ही पुन्हा वळणावळनाचा घाटरस्ता उतरत पुढे तापोळ साठी मार्गीस्थ झालो.

बामणोली वरून खर तर वासोट्या साठी लौंचची सोय असते . पण ह्या वेळेस त्याचं काहीतरी संप वगैरे चालू असल्यामुळे आम्हला २ तासाची वळणा वळणाची रपेट करावी लागली.

तशी तापोळ वरून आमच्यासाठी २ नौकेची सोय झाली होती. अगोदरच त्यांच्याशी बोलणं वगैरे करून . साधारण सव्वा नऊ साडे नऊ दरम्यान आम्ही तापोळला येउन पोहचलो . ते कोयानाचे विशाल पात्र डोळ्यात साठवूनच.

पुढे तापोळला गाडी एका ठिकाणी पार्क करून ...आम्ही नौका सफर साठी तयार झालो.
ह्या पुढचा प्रवास आमचा शिवसागराच्या अथांग जलाशयातून होता.





साधारण दहा वाजता आधे ईधर आधे उधर करत आम्ही नौकेत पाउल ठेवले.

अन काही वेळेतच इंजिनाचा आवाज गरजू लागला . अन हवेत धुरांचे लोळ उसळत , अन खाली पाण्याचे वलय उमटत आमचा त्या नौकेतून वासोट्या कडे तरंगमय प्रवास सुरु झाला.
------------------------------------------------------------------------------------------------------

वासोटा - इतिहासाकडे एक नजर फिरवल्यास ...

कोल्हापूरच्या शिलाहारवंशीय दुसऱ्या भोज राजाकडे ह्या किल्ल्याच्या निर्मितीचे श्रेय जाते . 
नंतर प्रथम शिर्के व मग मोरे यांच्याकडे त्याचे स्वामित्व गेले.
शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोर्यांची चंदाराई बुडवून जी काही अमोलिक दुर्गरत्ने प्राप्त करून घेतली , त्यात रायगड , वासोटा हि प्रमुख होती.

वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा शोध घेता आपल्याला वसिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल. असे मानले जाते की, वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला, सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर राहण्यास आला व त्याने आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले. कालांतराने या देशीच्या क्षत्रियांनी त्या डोंगराला तटाबुरूजाचे साज चढवून लष्करी ठाणे केले. त्या डोंगराचे परंपरागत ’वसिष्ठ’ हे नाव अपभ्रंश होऊन ‘वासोटा’ झाले.

त्याच वासोट्याचे रूप न्ह्याहाळत ...मनी उमललेल्या स्वप्नाच्या दिशेने आमचा खराखुरा प्रवास सुरु झाला .
एक आगळीक हुरहूर , एक आगळीक मजा अन नवा उत्साह संचारला होता ..तना मनात !
डोळे भिरभिरत ..चूहु दिशेने .
कुठे पाहू कुठे नको ..., सर्वत्र आनंदाचा स्वर '' किती अनोखं , किती विलोभनीय !
सृष्टीचं च इतकं मनोवेधक दृश्य मनाला स्वर्ग सुखाचा आनंद देत .

सूर्य नारायणाचे तेज लहरी हि शिवसागराच्या मुखपटलावरती एखाद्या अलौकिक मोतीवाने झळाळत .
तेंव्हा असे भासे कि , जणू सागराच्या पोटी वर्षानुवर्षाच्या तपानंतर मिळणारा एखादा मोती आज ह्या जलाशयाच्या मुख पटलावरती कितीएक संख्न्यान एकत्रितरित्या झळाळत आहे . अन सृष्टीच्या सौंदर्यात अधिक्तेने भर घालत आहे .

तिन्ही बाजूस घनदाट झाडी , वर मोकळा आकाश ,नजरेत सामावणारा अन क्षणाक्षणात समीप येऊ पाहणारा , गर्द झाडीत स्वतःला लपेटून घेतलेला अन जमिनीपासून साधारण २ हजार फुट उंचीवर वसलेला वासोटा , त्याच रांगड रूप ...अन शिवसागराचं वाहत्या
(धावत्या )नौकेतून होणार अथांग दर्शन ..! काय म्हणावं....
निसर्ग 'खरंच. वेड' लावतं अक्षरशा वेडं !

साधारण २ तासाच्या नौकाविहारातून आम्ही वासोट्याच्या पायथ्याशी येउन पोहोचलो.
अन खांद्यावरून उतरवलेली पाठ्पिशावी पुन्हा खांद्यावर घेत. नौकेतून पायउतार झालो .


कोयना अभयारण्याच्या स्वागत कक्षेत आमचा आता प्रवेश झाला होता . प्रवेश दरम्यानच वाघाची छबी अन त्याची दिलेली माहिती आम्हाला ..सावधतेचा इशारा देत होती .
' वन्य श्वापदांचा मुक्त संचार असलेल्या अभयारण्यत आता तुमचा प्रवेश होत आहेत' . तेंव्हा जरा सांभाळून असा जणू इशाराच होता तो.

तिथून एक दोन एक पाऊल पुढे टाकत आम्ही वन अधिकाऱ्यांच रेस्ट हाउस जवळ आलो. वनअधिकारी आमच्या स्वागताला तयार होतेच. 











स्वागत कस तर इथे हि क ' ह्या बाराखडी पासूनच .....,
कुठून आलात ,किती जण आहात ? काय नि कस वगैरे वगैरे ...!

हे सर्व सांगून झाल्यावर नंतर हि ...प्रत्येकाकडे किती बॉटल्स आहेत , प्लास्टिक पिशव्या किती आहेत ? ह्याची तपासणी अन मोजणी...
खर तर हे एक बर झालं . प्लास्टिक अन कचरा मुक्त जंगल वर्षो न वर्षी तरी टिकून राहील .
नाहीतर जिथे जातो तिथे असतोच प्लास्टिक अन कचर्याचा ढीग इकडे तिकडे पसरलेला .
शिस्त नाहीच .....
अशाने चला शिस्त तरी लागेल. जे फक्त दारू ढोसायला अन पिकनिक म्हणून गडवारया करतात त्यांना काही अंशी तरी ..!

असो ,तर मूळपदावर येतो
दुपारचे बारा वाजून गेले होते. पाठीवरल्या पिशव्यांच ओझं नको म्हणून फक्त काही पाठ पिशव्याच सोबत घेत (त्यात द्पारच जेवण अन पाण्याच्या काही बॉटल्स मोजून घेतलेल्या ) इतर पाठपिशव्या वन अधीकारयाच्या देख्रेखाली ठेवून दिल्या.

अन रानावनातून पायवाटा तुडवत वासोट्याच्या दिशेने वाटचाल करू लागलो.
जाता जाता काही एक अंतर सोडून , इतर वन्यप्राणी पक्षांचे वन अधिकारांनी लावलेले माहिती फलक त्याचं इथलं असणारया वास्तव्याची जाणं करून देत होते.

काही वेळेतेच म्हणजे जवळ जवळ १५- २० मिनिटाने एक खळखळता ओढा ओलांडून आम्ही हनुमान अन गणेश मूर्ती एकत्रित असलेल्या बिना छपराच्या मंदिरा जवळ आलो.




तिथे थोडा विसावलो ते दर्शन घेत उभ्या उभ्याच ..!
 
चहूकडे पसरलेली घनदाट झाडी ,अन शांत लहरीत विसावलेला थंडावा मन अगदी प्रसन्न करी.
मंदिरासमोरून वाहणारा खळखळता ओढा मनाचे तरंग उठवी. त्याचं पाणी इतक गोड अन शीतल कि असलेली तृष्णा सहज भागे.
इथून पुढे दीड तासाच्या प्रवासात पिण्याच पाणी मिळणार न्हवत. त्यामुळे रिकाम्या झालेल्या बॉटल्स इथल्या इथेच भरल्या अन
'' वासोट्याकडे '' असा बाण दर्शवणार्या पाटी कडे एक वार पाहत आम्ही पुढचा रस्ता धरला. 

साधारण दीड तासाच्या सुखद चढनी नंतर , आम्ही गडाच्या ढासलेल्या दरवाज्यापाशी ' ढासळंलेल्या तर काही शाबूत ' अश्या पायऱ्यानिशी गडावर पोहोचलो.


दरवाज्या जवळच एक दगडी जोथा त्याच अस्तित्व दाखवत निपचित पडून होता. एक चाल पुढे गेल्यावर हनुमानाचं विनाछपराच मंदिर दिसलं . हनुमानाची ती सुंदर सुबक मूर्ती लक्ष वेधून घेत होती. त्यामुळे मन आवरेना ..नजरेच्या कैदेत ते क्षण सामवून, मनोमन वंदन करून कॅमेरात ती प्रतिमा बंदिस्त करू लागलो.

हनुमान मंदिरापासूनच डावीकडे जाणारी वाट आपल्याला पाण्याच्या टाक्या जवळ अन बाबू कड्यापाशी घेऊन जाते. हरिश्चंद्रगड गडाच्या कोकण कड्याशी साधर्म्य असणारा हा कडा तितकाच विलोभनीय आहे .
समोरच जुना वासोटा आपला दर्शन घडवत इतिहासाची पुनवृत्ती करतो
वासोट्याचा जुळाभाऊ जुना वासोटा हा उंचीनं अधिक असल्याने इथे घडलेल्या प्रत्येक लढाईत हा वासोट्याचा काल ठरला आहे. 
बापू गोखल्यांशी आठ दहा महिने प्रखर झुंज देऊन ताई तेलीनीने (ओंध पंत प्रतिनिधी ह्यांची स्त्री) हा किल्ला लढवला . पण शेवटी १७३० रोजी हा किल्ला बापू गोखले ह्यांच्या ताब्यात आला. तो जुना वासोट्या वरून तोफा डागल्यानेच .
१८१८ सालच्या शेवटच्या इंग्रज मराठे युद्धाततही जुन्या वासोट्या वरूनच मोर्चे बांधणी केल्याने .हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

इतिहासाची अशी रक्तरंजित शौर्य कथा ऐकून वाचून अन प्रत्यक्ष ती तिथे अनुभवून,  मन प्रत्येक इथल्या बाबीला वास्तुला , त्यां शूर सेनानींना सलाम करतं त्यापुढे नतमस्तक होतं.
सह्याद्रीतल्या अशा प्रत्येक किल्ल्यावर जावून आपला माथा तिथे टेकवावा अस हे पवित्र स्थान म्हणजे आपले गड किल्ले ..खरचं..!

इतिहास संदर्भ -
१) ट्रेक क्षितीज वेबसाईट
२) साद सह्याद्री भटकंती किल्ल्यांची - प्र. के घाणेकर

क्रमश :- पुढचा भाग लवकरच ..
संकेत य. पाटेकर
२०.१२.२०१३
२७.१२.२०१३


मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१३

'' आमची रायगड वारी''


इंटरनेट माध्यमातून घेतलेला फोटो ..
आषाढी एकादशीला वारकरी जसे तहान भूख विसरून,विठू माउलीच्या नावाचं गजर करत अगदी तल्लीन होवून आपलं देहभान विसरत आपुल्या माउलीच्या दर्शनासाठी ,त्याच्या भेटीसाठी मैलो दूर प्रवास करत पंढरी वारी करतात.
तसेच माझ्या ह्या लाडक्या राजाच्या भेटी साठी , ह्या गड किल्ल्यान वरील पवित्र माती लल्लाटी लाविन्या साठी ,इथली प्रत्येक वास्तू अन चिरयान चिर्यातून घडलेला सारा इतिहास हृदयी सामावून त्यातून प्रेरणा घेऊन इथे नतमस्तक होण्यासाठी ..पाऊल आपुसकच दर शनिवार रविवारी ह्या प्रेरणादायी गड किल्ल्यांकडे वळली जातात .
मनाचा एकच गजर करून ....इथल्या मातीला प्रणाम करून ..
जय भवानी जय शिवाजी ..!!

त्यातल्या त्यात राजगड अन रायगड असेल तर तन मन अगदी शिवमय होवून जातं.
कारण हि तर आम्हला तीर्थक्षेत्र . इथला प्रत्येक चिरा ना चिरा आपल्या राजाची, त्यांच्या शौर्याची , पराक्रमाची , त्यांच्या सदहृदयी मनाची महती सांगतो.
इथल्या एक एक प्रसंगाची आठवण करून देतो. ते सार पाहताना, अनुभवताना मनाची कधी समाधी अवस्था लागते तर कधी तना मनात आत्म्विश्वाचे नवे बळ संचारते.

काल परवाच असंच रायगड वर जाण्याचा पुन्हा योग आला .
तशी हि माझी चौथी खेप , खेप म्हणण्यापेक्षा चौथी वारी ..रायगड ची !
तरी सुद्धा रायगड काही अजून पूर्ण पाहून झालाच नाही .
पण रायगड वर जे अनुभवलं , जे पाहिलं ते '' सुवर्ण क्षण '' कायम स्मरणात राहतील असेच आहे.
(तसं तुम्ही एकाच ठिकाणी कित्येक वाऱ्या केल्या तरीही तुम्हाला प्रत्येकवेळी नवं काही अनुभवयास मिळतंच मिळत .ह्या वेळेसही मला नवं काही पाहायला मिळाल ,अनुभवयास मिळाल . ) 
















इतिहासाचा अमुल्य साठा असणारे , आपल्या गड-किल्यांवर , शिवरायांवर नितांत प्रेम असणारे ,
वयाच्या पंच्यातरीतही गड किल्ले सर सर चढणारे उतरणारे , इतिहास संकलक अप्पा परब ह्यांची योगा योगाने भेट घडली ती रायगड वरच .
त्यांच्या ह्या आगमनाने मात्र इतिहासाची न उलगडलेली अमुल्य पाने आज आमच्या समोर पुनः उलगडू लागली .
राणी महाल पासून , राजवाड्यापर्यंत , टांकसाळ ते भवानीहुडा (देवघर )पर्यंत , राजदरबार ते
नगारखाना ह्यां मध्ये एका बाजूला असलेल्या त्या खडकाच (भूमी पूजनाचा खडक ) नक्की प्रयोजन काय ? इथ पर्यंतचा इतिहास त्या संबंधित कथा नव्यानेच ऐकण्यास मिळाल्या .
ते ऐकताना अंग अंग शहराल . 
पुढे दुपाच्या भोजनाची वेळ झाल्या कारनाने आम्ही आमच्या वाटेस लागलो. आमच्या मुक्कामी पोहचलो .
(जिथे आजची रात्र काढणार होतो ) तिथे थोडी पेट पूजा आटोपून काही वेळाने पुन्हा मार्गीस्थ लागलो . 
ते होळीच्या माळेवरून , बाजारपेठेतून , टकमक च्या दिशेने...


जिथे आज एक फर्मान निघाल होतं. 
आज एकाचा कडेलोट होणार होता , आणि त्या शिक्षेच पात्र ठरलो होतो तो ''मीच'' . (अर्थात हा गंमतीचा भाग ) 
कडेलोट करण्याचमागच कारण मात्र त्या दोन देवींनाच माहिती . 
एक तर गीतू अन स्नेहू , बहुतेक मी प्रवासात किंव्हा काही दिवसांपासून त्यांना थोडा अधिक त्रास दिला असावा 
इतकच . पण त्याची किती मोठी हि शिक्षा ..!!
अर्थात हा गंमतीचा भाग .
पुढे पाउल जशी टकमक टोका कडे सरसावू लागली . 
तसं तसे ह्या राकट कणखर सह्याद्री रांगांनी त्यांच्या नयनरम्य दर्शनाने मन अगदी मंत्रमुग्ध झालं.

एकीकडे दिसणारा कोकण दिवा पुढच्या मोहिमे साठी तयार रहा अस म्हणत मनाशी सांगड घालू पाहत होता . रायगडाच दर्शन इथुन हि किती सुंदर मोहक दिसत ते जरा पाहून घे ? 
ये कधी तरी आपल्या सवंगड्यांना घेऊन इथे हि माझ्या अंगा खांद्यावर ...
मी तुला रायगडच सोनेरी रूपाच दर्शन घडवेन .
आजोबा - नातवाचं जस खेळकर प्रेम असतं . तसं प्रेम ह्या क्षणी मनी दाटून आल होतं .

टकमक टोकावरील घुंगावनारा वारा अजूनही त्या क्षणाची आठवण करून देत होता . 
म्हणत होता बघ त्या दिशेला दिसतंय का ते गाव , छत्री निजामपूर .., हो , हो तेच ते ..छत्री निजामपूर !

''छत्रीचा दांडा सोडू नकोस घट्ट धर '' असे म्हणणारे शिवराय आणि तो वाऱ्याच्या लाटे समवेत हवेत तरंगत असलेला शूर मावळा '' येथूनच हा सारा प्रसंग घडला होता आणि मी त्याला प्रत्यक्ष साक्षी होतो .
कित्येक वर्ष होवूनही हा प्रसंग मी इथे येणारया प्रत्येकाच्या कानी मनी हळूच सांगत असतो . 
त्या प्रसंगाची आठवण करून देत असतो .

निसर्गाच्या अशा प्रत्येक बाबी आपल्या मनाशी काही ना काही गुजगोष्टी करतच असतात . त्यासाठी संवेदनशील मनाची अन निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीत समरस होण्याची सवय जोडावी लागते . मग मनासोबत निसर्र्गाच्या नितांत गप्पा सुरु होतात . मग वारा बोलू लागतो , नदी नाले , डोंगा दर्या , पक्षी पाखरे , वृक्ष वेली , निर्जीव दगड धोंडे हि आपल्याशी गुजगोष्टी करू लागतात .
-------------------------------------------------------------------------
मन अशाच गुजगोष्टीत हरवलं असता . '' चला निघूयात'' अशी आर्त हाक ऐकू आली .
अन पाउलं टकमक टोका कडून ..जगदीश्वराच्या प्रासादलया कडे हळूच वळू लागली .
...जगदंब जगदंब नामस्मरण करत !! 

 
आता सायंकाळचे ५ वाजत आले होते .
सूर्य नारायण हि मावळतीला त्याच्या रोजच्या दिन क्रमानुसार वाटचाल करू लागला होता .
त्याची तांबूस सुवर्ण किरणं मात्र अंगाखांद्यावर अजून लोळण घेत होती .
पाउलं हळूवार टप्प्या टप्याने जगदिश्वरच्या दिशेने ...मार्गीक्रमण करत होती .

पुढे काही मिनिटे अशीच चालत गेल्यावर ,
एका सपाटीवर ,वृक्ष वेलींच्या दाट सावलीखाली ,थकल्या भागल्या लोकांची तृष्णा भागविण्याकरिता एक १०- ११ वर्षाची गोड मुलगी( नाव गीता )
लिंबू पाणी, ताक, कोकम सरबत ह्यांनी भरलेलं भांड कुंड एका टेबलावर जमवून , आमच्या येणाऱ्या चेहऱ्याकडे कटाक्षाने पाहत उभी होती. आम्ही समोर येताच तिच्या गावरान बोलीत,
दादा ताक घेता का ? ताक अस म्हणत ? मनोमन आम्ही ते घ्याव प्यावं अस , नजरेन सांगत होती .

तशी आमची मनं हि तृष्णेने काहीसी व्याकूळ झालेली . त्यामुळे क्षणभर त्या वृक्ष वेलीच्या दाट छायेखाली विसावा घेत आम्ही घट्ट ताकाचे एक दोन पेले गटा गटा पीत आमची तृष्णा भागविली .
अन काही क्षणाच्या विसाव्या नंतर , थोड्या अधिक चढणीचा मार्ग पत्करत , काहीसे अंतर चालत आम्ही जगदिश्वराच्या प्रवेश द्वारातून प्रांगणात प्रवेश करते झालो.

मंदिर म्हटलं कि ते एक पवित्र स्थान . अन त्याला फार महत्वाच स्थान आहे आपल्या जीवनात .
कारण देव देवतांचा तिथे वास्तव्य असतं. आणि अशा जागी ईश्वरी पण एक अदृश्य शक्ती सदा वास करत असते .
अन हिच शक्ती आपल्या तना मनात , नव्या परीने सकारात्मक विचारंच बळ प्राप्त करून... चैतन्याच नव अंकुर  रुजवू लागते. अशा चैतन्यमय वातावरणात मी प्रवेश करता झालो . तन मन अगदि प्रसन्न झालं .
पण पाउल जशी पुढे पुढे सरकू लागली तसं ' मन' पुन्हा इतिहासाकडे वळू लागल .
इतिहासाची अमुल्य पाने पुन्हा उलगडू लागली.

अन भारवलेल्या त्या क्षणाची पुन्हा आठवण झाली. नजरेसमोर सारा क्षण पुन्हा जिवंत झाला .
इथेच ह्या प्रांगणात ...
गडावरील काही मंडळी आपल देहभान विसरून ...
त्या १३ वर्षाच्या त्याच्या पहाडी आवाजानं त्याच्या काव्यान अगदी ध्यान मग्न झाली होती .

एकच आवाज चारी बाजूने दुमदुमत होता .
सेर सिवराज है ! सेर सिवराज है !

मंदिराच्या त्या कच्छ मंडपात तो बालक अर्थात कवी भूषण ''
त्याने रचलेले काही छंद शिवरायांसमोर आपल्या वज्र बोलीत पहाडी आवजात गाउन दाखवत होता .
इंद्र जिमी जम्भ पर बाड्व सुअम्ब पर
रावण सदम्भ पर रघुकुलराज है ||१||
पौन बरिवाह पर | संभु रतिनाह पर |
ज्यो सहसबाह पर | राम द्विजराज है ||२||

दावा द्रुम दंड पर | चिता मृग झुंड पर |
भूषण बितुंड पर | जैसे मृगराज है ||३||
तेजतमअंस पर | कान्ह जिमी कंस पर |
त्यों म्लेंछ बंस पर| सेर सिवराज है ||४||

सेर सिवराज है ! सेर सिवराज है!

ह्या आवाजाने सारा आसमंत दणाणून गेला होता . जो तो तल्लीन झाला होता . त्या भावसमाधीतून बाहेर पडू इच्छित न्हवता. ह्या पंक्ती त्याने तब्बल अठरा वेळा म्हणून दाखवल्या होत्या .
शिवरायांनी त्याला योग्य ती बक्षिशी दिली होती .

हा सारा प्रसंग इथेच घडला होता . आणि त्याचा प्रत्यय, ' आता ह्या क्षणी हि येत होता . जणू हा प्रसंग नजरेसमोर घडतोय घडत आहे . आणि मी त्यास प्रत्यक्ष साक्षी आहे .

छत्रपति शिवराय अन कवी भूषण ह्यांची हि पहिली भेट .
अन हे इतिहास संकलक अप्पा परब ह्यांनी फारच सुंदरतेने वर्णन केल आहे . त्यांच्या पुस्तकात .
ते तुम्ही अवश्य वाचा.

इथे आल्यावर आपली हि भावसमाधी लागते. आपण हि त्या लयात अगदी नाचू डोलू लागतो .
तन मन गाऊ लागत.

सेर शिवराज है ..!!

क्रमश :-
संकेत य पाटेकर
३०.११.२०१३